सर्व्हर बंद पडल्याने विमानसेवा देणारी आघाडीची कंपनी इंडिगोची रविवारी दिल्ली विमानतळासह देशभरातील सर्वच विमाने ठप्प झाली होती. यामुळे प्रवाशांना तासंतास विविध विमानतळांवरच ताटकळत राहावे लागले. तब्बल 90 मिनिटे इंडिगोचं सर्व्हर बंद होतं, त्यामुळे या एअरलाईन्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागला.

90 मिनिटानंतर सर्व्हर सुरू झालं त्यानंतर इंडिगोची सेवा रखडत सुरू झाली. ट्विटरद्वारे कंपनीने याबाबत माहिती दिली आणि घडल्या प्रकाराबाबत इंडिगोने प्रवाशांची माफीदेखील मागितली. पण विमानतळावरच ताटकळत राहावे लागल्याने प्रवाशांचा चांगलाच संताप झाला होता. अडचणींचा सामना करावा लागलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी इंडिगोने योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत असा आरोप अनेकांनी केला. पुढलं विमान केव्हा असणार, या विमानाच्या तिकीटाचं काय असे अनेक प्रश्न प्रवाशांच्या मनात होते. त्यासाठी विमानतळावरील इंडिगोच्या खिडकीवर प्रवाशांनी गर्दी केली होती, पण तेथुनही समाधानकारक उत्तर दिलं जात नव्हतं असा आरोप अनेकांनी केला आहे. काही जणांनी ट्विटरद्वारे इंडिगोविरोधातील आपल्या संतापाला वाचा फोडली.