सध्या देशात करोनाचं थैमान वाढत आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या पॅकेजची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाची घोषणा केली असून २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. “हे पॅकेज स्वावलंबी भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटींचं आहे. २०२० मध्ये जाहीर करण्यात आलेलं हे २० कोटींचं पॅकेज स्वावलंबी योजनेला नवी गती देईल”. हे पॅकेज जीडीपीच्या १० टक्के असल्याचंही मोदी म्हणाले होते. या पॅकेजचं उद्योगजगताकडून स्वागत करण्यात आलं आहे.
या पॅकेजनंतर दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट केलं आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्पे डिअम भाषण होतं. आम्हाला नंतर कळेल की हे परिवर्तन १९९१ च्या धर्तीवर होईल की नाही. मला असं वाटतं आज रात्री मला नीट झोप लागणार नाही,” असं आनंद महिंद्रा म्हणाले होते. पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आर्थिक पॅकेजची घोषणा करताना याबाबत अधिक आणि सविस्तर माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन देणार असल्याचं म्हटलं होतं.
This was the PM’s Carpe Diem (Seize the Day) speech; an opportunity to change the narrative from ‘Survival’ to ‘Strength.’ We will know tomorrow whether or not this is going to be a transformational moment like 1991. What I also believe is I won’t get much sleep tonight!
— anand mahindra (@anandmahindra) May 12, 2020
“पंतप्रधान जमीन, श्रम, रोख आणि कायदा सुलभतेबद्दल सांगितलं त्याचा आम्ही आदर करतो. हेच अर्थव्यवस्थेसमोरील मोठं आव्हान आहे. या चार क्षेत्रात सुधारणा झाल्यास आर्थिक विकासाला या संकटकाळात चालना मिळेल,” असं मत सीआयआयचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी व्यक्त केलं. तर फक्कीच्या अध्यक्षा संगीता रेड्डी म्हणाल्या की,”अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, व्यवस्थापन, लोकसंख्या आणि मागणी ही क्षेत्र बळकट केल्यास भारत पुन्हा आर्थिक वृद्धीच्या मार्गावर येईल.”
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅकेजची घोषणा केली. ही खरंच एक उल्लेखनीय पॅकेज आहे. याची सर्वांना प्रतीक्षा होती. यामुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळेल,” असं मत असोचेम आणि नारेडकोचे अध्यक्ष डॉ. निरांजन हिरानंदानी यांनी व्यक्त केलं.
भारत महासत्ता बनणार
“भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या पाच पायाभूत बाबींना मजबूत केल्यास भारत नक्कीच महासत्ता बनेल. आर्थिक पॅकेज सोबतच कृषी, कर व्यवस्था, पायाभूत सुविधा, मनुष्यबळ विकास आणि आर्थिक प्रणालीत सुधारणा केल्यानं गुंतवणुकदार आकर्षित होती. तसंच मागणी वाढवण्यातही मदत मिळेल. मेक इन इंडियाअंतर्गत गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल,” असं मत असोचेमचे महासचिव दिपक सूद यांनी व्यक्त केलं.
आर्थिक उपक्रमांना चालना
“या काळात मोठ्या पॅकेजची आवश्यकता आहे. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी याचा नक्की फायदा होईल आणि यामुळे आर्थिक उपक्रमांना चालनाही मिळेल,” अशी प्रतिक्रियी पीएचडी चेंबर ऑफ कामर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष डी.के. अग्रवाल यांनी व्यक्त केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 13, 2020 8:14 am