येथून ४० किलोमीटर अंतरावरील राजबरी येथे रविवारी फेरीबोटीची ट्रॉलरशी टक्कर होऊन झालेल्या दुर्घटनेत ३३ जण मृत्युमुखी पडले असून त्यामध्ये महिला आणि मुलांचा मोठय़ा संख्येने समावेश आहे. क्षमतेपेक्षा अधिक संख्येने भरलेल्या या फेरीबोटीत १५० हून अधिक प्रवासी होते.
सदर फेरीबोट दौलतदिया येथून पतुरिया येथे जात असताना या बोटीला मालवाहतूक करणाऱ्या ट्रॉलरने जोराची धडक दिली. या दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रवाशांची लगेचच ओळख पटू शकली नाही. आपली पत्नी आणि सासू या वेळी बेपत्ता झाल्याचे बचावलेल्या एकाने सांगितले, तर केबिनमध्ये असलेल्या अनेक प्रवाशांना बाहेर पडण्याचीच संधी न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवला.