आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर दिलासा मिळाला आहे. याप्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयानं चिदंबरम यांना दोन लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. त्यामुळे तब्बल १०६ दिवसांनी चिदंबरम यांचा तिहार तुरूंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चिदंबरम यांना जामीन मिळताच काँग्रेसकडून ट्विट करत अखेर सत्याचाच विजय झाला आहे अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. अटक झाल्यापासून पी चिदंबरम जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन दिला आहे. आता ईडीच्या गुन्ह्यातही त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना काही अटी घातल्या आहे. पी चिदंबरम यांना परवानगीशिवाय देशाबाहेर जाता येणार नाही. तसंच साक्षीदारांना भेटण्याचा आणि त्यांना प्रभावित करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यासोबत माध्यमांना मुलाखती देण्यास बंदी घालण्यात आली आहे.