इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने २०११ साली आयपीएल स्पर्धेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला असल्याचे महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाच्या एका आधिका-याकडून सांगण्यात आले आहे. या तयारीचाच भाग म्हणून इंडियन मुजाहिद्दीनच्या एका हस्तकाने २०११ साली वानखेडे स्टेडियमवरील टी-२० मॅचअगोदर मैदानाची पाहणी केली होती. मात्र, वानखेडेवरील कडक सुरक्षाव्यवस्थेमुळे इंडियन मुजाहिद्दीनचा हल्ल्याचा बेत बारगळला. मुंबईत जुलै २०११ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या असदउल्ला अख्तरअली तरबेज याच्या चौकशीदरम्यान ही माहिती समोर आली आहे. असदउल्लाचा साथीदार असणा-या वकास इब्राहिमने यासीन भटकळच्या सांगण्यावरून हल्ल्यासाठीच्या तयारीसाठी मुंबई इंडियन्स आणि पुणे वॉरियर्स यांच्यातील सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडियमच्या आत जाऊन पाहणी केली होती. त्यावेळी वानखेडेवर कडक सुरक्षाव्यवस्था असल्याचे पाहणीत समोर आल्यानंतर हल्ल्याचा बेत रद्द करण्यात आला होता.