“सुरुवातीच्या काळातच करोनाला रोखता आलं असतं. पण लागोपाठ घेण्यात आलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे आणि करोनाच्या सुरुवातीच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच करोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि आजपर्यंत या विषाणूनं जगभरात ३३ लाख लोकांचा जीव घेतला आहे”, अशा कठोर शब्दांमध्ये आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या गटाने जगभरातल्या सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. खुद्द जागतिक आरोग्य संघटनेच्या धोरणावर देखील या गटाने परखड टीका केली आहे. WHO नंच नेमलेल्या दि इंडिपेंडंट पॅनल फॉर पँडेमिक प्रिपेर्डनेस अँड रिस्पॉन्स अर्थात IPPPR या गटाने ही निरीक्षणं नोंदवली आहेत. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. WHOनंच मागवलेल्या यासंदर्भातल्या अहवालामध्ये या गटानं आपली परखड निरीक्षणं नोंदवली आहेत.

वुहानमधल्या उद्रेकाकडे दुर्लक्ष!

“जागतिक आरोग्य संघटनेसोबतच इतरही अनेक देशांनी चीनमधल्या वुहानमध्ये झालेल्या सुरुवातीच्या करोना उद्रेकाकडे दुर्लक्ष केलं. त्याकडे लक्ष देऊन तातडीने पावलं उचलण्यात हे देश कमी पडले आणि त्याचा परिणाम म्हणून फेब्रुवारी २०२०मध्ये करोना जगभरात पसरला. यासंदर्भातल्या इशाऱ्याकडे लक्ष देण्यात अनेक देश कमी पडले”, अशा शब्दांत या अहवालात ताशेरे ओढण्यात आले आहेत. “निरनिराळ्या देशांमधील सरकारांना लोकांचं संरक्षण करण्यात अपयश आलं असून विज्ञानाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नेत्यांनी जनतेचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास कमी होण्यास हातभारच लावला”, असं देखील अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

“…म्हणून भारतात करोनाची इतकी वाईट परिस्थिती!” डॉ. फौचींनी सांगितलं कारण!

तयारीमध्ये दिरंगाई!

दरम्यान, “करोनासारख्या संकटासाठी तयारी करण्यात दाखवलेली दिरंगाई, अपयश आणि निर्णयांमध्ये असलेल्या त्रुटी यामुळे या संकटाचं गांभीर्य वाढलं”, असं देखील अहवालात म्हटलं आहे. “चुकीचे निर्णय आणि नियोजनाचा अभाव यामुळे एक विषारी कॉकटेल तयार झालं आणि त्यातून प्रादुर्भाव वाढला”, असं यात म्हटलं आहे.

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण तूर्त स्थगित, राज्य सरकारचा निर्णय!

करोनाचा सामना करायचा असेल तर…

करोनाच्या सध्याच्या साधीचा सामना करायचा असेल, तर जगातल्या श्रीमंत देशांनी १०० कोटी लसीचे डोस सर्वाधिक गरीब देशांना पुरवले पाहिजेत. तसेच, या देशांनी अशा प्रकारच्या पुढच्या साथींचा सामना करण्यासाठी तयारी करणाऱ्या संस्थांना आर्थिक पाठबळ द्यायला हवं, असं देखील या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.