काही दिवसांपूर्वी चीनसोबत मोठी डील केल्यानंतर चाबहार रेल्वे प्रकल्पातून इराणनं भारताला वगळण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं. चीन आणि इराण या दोन्ही देशांमध्ये ४०० अब्ज डॉलर्सच्या डीलचा हा परिणाम असल्याचं मानलं जात होतं. परंतु आता इराणनं या वृत्तानं खंडन केलं आहे. भारत हा चाबहार जहेदान रेल्वे प्रकल्पाचा भाग असल्याचं इराणनं स्पष्ट केलं आहे.

भारताला इराणनं चाबहार रेल्वे प्रकल्पांमधून वगळलं असल्याच्या या वृत्तांचं इराणकडून खंडन करण्यात आलं आहे. इराणचे परिवहन आणि रेल्वे विभागाचे उपमंत्री सईद रसौली यांनी यावर प्रतिक्रिया दिली. या वृत्तांमागे कोणता तरी कट असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

२०२२ पर्यंत काम होणार पूर्ण

गेल्या आठवड्यात इराणचे परिवहन व नगरविकास मंत्री मोहम्मद इस्लामी यांनी ६२८ किलोमीटर लांबीच्या रेल्वे ट्रॅकच्या कामाचं उद्घाटन केलं. हा रेल्वे मार्ग अफगाणिस्तानाच्या झारंज सीमेपर्यंत वाढविण्यात येणार आहे. द हिंदूनं दिलेल्या वृत्तानुसार हा प्रकल्प मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे. भारतानं यासाठी निधी न दिल्याचं सांगत या प्रकल्पातून भारताला वगळण्यात आल्याचं वृत्त माध्यमांमध्ये काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालं होतं.

२०१६ मध्ये करार

२०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इराण दौर्‍यादरम्यान चाबहार करारावर स्वाक्षरी झाली होती. संपूर्ण प्रकल्पात सुमारे १.६ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार होती. इरकॉनचे अभियंतेदेखील हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इराणमध्ये गेले होते. परंतु अमेरिकेच्या निर्बंधामुळे भारताने रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू केले नाही. अमेरिकेने चाबहार बंदरासाठी सवलती दिल्या आहेत पण उपकरण पुरवठादार उपलब्ध नाहीत.