कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य केले. लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज आणि नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी इशरत जहॉं प्रकरणावरून निशाणा साधला.
इशरत जहॉं प्रकरणात सीबीआयने आपल्या आरोपपत्रात सध्याचे गुप्तचर विभागाचे विशेष संचालक राजेंद्र कुमार यांचे नाव घातले आहे. राजेंद्र कुमार यांनी सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांच्यासोबत काम केले आहे. मोदी ज्यावेळी भाजपचे हिमाचल प्रदेशचे पक्षाचे प्रभारी होते, त्याचवेळी राजेंद्र कुमार यांची चंदिगढमध्ये गुप्तचर विभागात बदली करण्यात आली. जेव्हा अडवाणी केंद्र सरकारमध्ये मंत्री होते, त्यावेळी राजेंद्र कुमार यांची अहमदाबादला गुप्तचर विभागात सहसंचालक म्हणून बदली करण्यात आली होती, असे दिग्विजयसिंह यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.
भाजपमधील वरिष्ठ नेते आणि राजेंद्र कुमार यांचे घनिष्ठ संबंध आहेत असे तुम्हाला वाटते का, असे विचारल्यावर दिग्विजयसिंह म्हणाले, मी कोणतेही मत मांडत नाहीये. मी केवळ घडलेल्या घटना सांगत आहे. अडवाणींच्या नेतृत्त्वाखालीच राजेंद्र कुमार यांची अहमदाबादला बदली कऱण्यात आली, ही सत्य परिस्थिती आहे. अहमदाबादमधील तत्कालिन सहायक पोलिस आयुक्त जी. एल. सिंघल यांनी सीबीआयला दिलेल्या जबानीमध्ये इशरत जहॉं चकमकीत राजेंद्र कुमार यांनी गुजरात पोलिसांना सहकार्य केल्याचे म्हटले होते, ही देखील सत्य परिस्थिती आहे.