अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष करझाई यांच्या सरकारमधील अनेक अधिकारी भारताला सहकार्य करण्यास अनुकूल होते, म्हणून पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयने २००१ नंतर तालिबानला पोसले, असे पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या पाठीत खंजीर खुपसणे भारताला शक्य व्हावे यासाठी करझाई मदत करीत होते, म्हणूनच त्यांचे सरकार कमजोर करण्याचा प्रयत्न आपल्या सरकारने केला, असेही मुशर्रफ यांनी म्हटले आहे. करझाई पाकिस्तानसाठी धोकादायक होते आणि त्यामुळेच आम्ही त्यांच्या हिताविरुद्ध काम केले, असेही मुशर्रफ यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे.भारताकडून पाकिस्तानविरोधात होणाऱ्या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्हीही काही गटांच्या शोधात होतो. त्यातच तालिबानच्या संपर्कात आलो आणि त्यासाठी आयएसआयचाच उपयोग झाला. करझाई यांनी भारतात प्रशिक्षण घेण्यासाठी लष्करातील काही जणांना पाठविले. करझाई यांची ही खेळी पाकिस्तानविरोधी असल्याचा विश्वास बसला, असे मुशर्रफ म्हणाले.