पाकिस्तान पुन्हा एकदा भारतीय लष्कराला नुकसान पोहोचवण्याच्या हेतूने मोठा कट आखत आहे. गुतप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी मिलिट्री इंटेलिजन्स (MI) आणि इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (ISI) भारतीय लष्करांच्या जवानांविरोधात कट आखत असून त्यासाठी योजना आखण्यात आली आहे. एमआय आणि आयएसआय भारतीय लष्करातील जवानांच्या जेवणात विष मिसळण्याचा कट आखत आहेत.

गुप्तचर यंत्रणांनी जम्मू काश्मीरमधील सुरक्षा दलांना जेवणात विष मिसळलं जाऊ शकतं म्हणून अलर्ट राहण्यास सांगिलं आहे. यासोबतच जेवणाचं सामान खरेदी करताना सावधगिरी बाळगण्यासही सांगण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत पाकिस्तानमध्ये तणाव सुरु असून भारताने कारवाई केल्याने पाकिस्तान बिथरला आहे. त्यातूनच हे कट रचले जात आहेत. सध्या सुरु असलेल्या घडामोडींमुळे गुप्तचर यंत्रणांनीही अलर्ट जारी केला आहे.

पाकिस्तानी नंबरवरुन करण्यात आलेल्या चॅटच्या आधारे दावा करण्यात आला आहे की, काश्मीरमध्ये सक्रीय असणारे एमआय आणि आयएसआय एजंट सुरक्षा दलांच्या रेशन साठ्यात विष मिसळण्याची योजना आखत आहेत.

यामुळे गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा दलांसाठी असणाऱ्या धान्य गोदामांची सुरक्षा वाढवण्यास सांगितलं आहे. विशेष करुन जम्मू आणि काश्मीरात सुरक्षेची काळजी घेण्यास सांगण्यात आलं आहे. याआधी अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना भारतावर हल्ला करु शकते असा इशारा दिला आहे.