बिहारमधील जनतेने जो कौल दिला आहे ते तेथील जनतेचाच विजय आहे. तर केवळ पैशांच्या जोरावर निवडणूक लढवू पाहणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा हा पराभव असल्याचे जनता दल युनायटेडचे अध्यक्ष शरद यादव यांनी म्हटले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, जदयू, राजद आणि काँग्रेसच्या महाआघाडीने स्पष्ट बहुमत मिळण्यासाठी आवश्यक जागांवर आघाडी घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद यादव म्हणाले, बिहारमधील लढाई अत्यंत कठीण होती. एकीकडे मनी बॅंक तर दुसरीकडे नितीमत्ता, सिद्धांत यांच्यात ही लढाई होती. लोकांनी महाआघाडीच्या पारड्यात मत टाकून आमच्यावर विश्वास दाखवला आहे. हा बिहारमधील जनतेसोबत देशातील जनतेचाही विजय आहे. आमच्याविरोधात मैदानात उतरलेल्या भाजपचा आणि त्यांच्या नेतृत्त्वाची धुरा वाहणाऱ्या नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा हा पराभव आहे.