शेतकऱ्यांची केंद्र सरकारसोबत सुरु असलेली आजची बैठकही संपली आहे. या बैठकीतही काहीही तोडगा निघालेला नाही. आता पुढची बैठक ९ डिसेंबरला होणार आहे. चर्चेची पुढची फेरी ९ डिसेंबरला होणार आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाचा आजचा दहावा दिवस आहे. ९ तारखेला दुपारी १२ वाजता पुन्हा एकदा चर्चा केली जाणार आहे. हरयाणा, पंजाबमधले शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन ठेपले आहेत. तिथे ते आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत ही त्यांची प्रमुख मागणी आहे.

दरम्यान ठोस तोडगा निघेपर्यंत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा दिला आहे. इतकंच नाही तर केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत म्हणून ८ डिसेंबरला शेतकऱ्यांनी एक दिवसाच्या भारत बंदचीही हाक दिली आहे.

कृषी मंत्र्यांनी बैठकीनंतर काय म्हटलं आहे?

एमएसपीला कुठलाही धोका नाही असं कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे. एपीएमसीला बळकटी आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. या सगळ्या आंदोलनातून तोडगे काढण्यासाठी जर शेतकरी नेत्यांनी दिले तर आम्ही त्यांचा विचार करु असंही त्यांनी म्हटलं आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांसाठीचंच सरकार आहे त्याला समृद्ध करणं हे आमच्या सरकारचं पहिलं कर्तव्य आहे असंही तोमर यांनी म्हटलं आहे. तसंच आपल्या माध्यमातून मी शेतकरी नेत्यांना हे सांगतो आहे की आंदोलनात जे वृद्ध आणि लहान मुलं आहेत त्यांना घरी पाठवावं. वाढती थंडी आणि करोनाचा धोका लक्षात घ्यावा. काही नेत्यांनी आम्हाला तोडगा सांगितला तर शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय आम्ही घेऊ असंही तोमर यांनी स्पष्ट केलं आहे.

अभिनेता दिलजीत दोसांजचा आंदोलनाला पाठिंबा
अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांजने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दिलजीत दोसांज सिंघू सीमेवर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी पोहचला आहे. आमची सरकारला ही विनंती आहे की त्यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्या. संपूर्ण देश शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा आहे असंही दिलजीत दोसांजने म्हटलं आहे.