आंध्र प्रदेशात प्रचंड बहुमत मिळवत सत्ता स्थापनेच्या मार्गावर असलेल्या वायएसआर काँग्रेस प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत रेड्डी यांना पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा देत, आपल्या शपथविधी सोहळ्यास येण्याचे आमंत्रणही दिले. जगनमोहन ३० मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

या भेटी अगोदर जगनमोहन यांचे जेव्हा दिल्ली विमानतळावर आगमन झाले. तेव्हा विमानतळाबाहेरच त्यांच्या समर्थकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. अखेर त्यांना सुरक्षारक्षकांनी कसेबसे बाहेर काढले.

जगनमोहन यांच्या पक्षाला विधानसभेच्या १७५ जागांपैकी १५१ जागांवर विजय मिळाला आहे. तर या निवडणूकीत चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष टीडीपीला केवळ २३ जागांवर यश मिळाल्याने राज्यात सत्ता परिवर्तन झाले. विधानसभेबरोबरच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही वायएसआर काँग्रेसची उत्तम कामगिरी राहिली. लोकसभेच्या २५ जागांपैकी तब्बल २२ जागांवर त्यांना विजय मिळाला आहे. तर, महाआघाडीसाठी धावपळ करणा-या चंद्राबाबूंच्या टीडीपीला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले.