बाबा राम रहिम हे ओसामा बिन लादेन या दहशतवाद्यापेक्षाही धोकादायक आहेत असे वक्तव्य जैन मुनी तरूण सागर महाराज यांनी केले आहे. ‘अमर उजाला’ या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार ही टीका समोर आली आहे. स्वतःला संत आणि बाबा म्हणवणारे राम रहिमसारखे लोक हे लादेनपेक्षा धोकादायक आहेत, त्यांना शिक्षा होणे योग्यच आहे. न्यायव्यवस्था आपले काम योग्य पद्धतीने करते आहे आपल्याला कोर्टाच्या निर्णयाचा आदर करायला हवा अशीही प्रतिक्रिया तरूण सागर महाराज यांनी केली आहे.

ओसामा बिन लादेन सारखे दहशतवादी हे काही लोकांना ठार करतात मात्र बाबा रहिमसारखे लोक हे कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेची हत्या करतात त्याचमुळे हे असले लोक एखाद्या कुख्यात दहशतवाद्यापेक्षाही जास्त धोकादायक आहेत असेही तरूण सागर महाराज यांनी म्हटले आहे.

बाबा राम रहिम यांना दोन साध्वींचे लैंगिक शोषण आणि बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. तसेच त्यांना सोमवारी शिक्षा सुनाविण्यात येणार आहे. एकीकडे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी बाबा राम रहिम यांची बाजू घेऊन एक आरोप महत्त्वाचा की कोट्यवधी अनुयायांचा पाठिंबा महत्त्वाचा असा प्रश्न केला आहे. तर दुसरीकडे इतर धर्मगुरूंकडून मात्र बाबा राम रहिम यांच्यावर टीका होते आहे. जैन मुनी तरूण सागर महाराज यांनी तर राम रहिम यांची तुलना ओसामा बिन लादेन या दहशतवाद्याशीच केली आहे.

सीबीआय कोर्टाने बाबा राम रहिम यांना बलात्कार आणि लैंगिक शोषणाप्रकरणी दोषी ठरविले आहे. आता यानंतर बाबा राम रहिम यांना दोषी ठरवले? असा प्रश्न विचारून हिंसाचार माजवला जाणे हे चूक आहे. या हिंसाचारामध्ये उगीचच निरपराध लोकांचा बळी गेला आहे असेही तरूण सागर यांनी म्हटले आहे.

कोर्टाने एखादा निर्णय दिल्यावर जर लोक हिंसाचार माजवत आहेत, असे होणार असेल तर मग कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा अर्थच काय उरतो? जे लोक तोडफोड करत आहेत त्यांचा न्यायालय आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही का? देशाच्या संपत्तीची नासधूस करणे म्हणजे स्वतःची संपत्ती संपविण्यासारखेच आहे असेही तरूण सागर यांनी म्हटले आहे. सीबीआय न्यायालयातर्फे जी शिक्षा बाबा राम रहिम यांना सुनावली जाईल ती त्यांना व्हायलाच हवी आणि आपण सगळ्यांनीच न्यायव्यवस्थेचा आदर करायला हवा, असेही तरूण सागर यांनी सुचवले आहे.