जयपूर : जयपूर येथे २००८ मध्ये घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या चार जणांना येथील विशेष न्यायालयाने शुक्रवारी मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. या बॉम्बस्फोट मालिकेत ७१ जण ठार झाले होते तर १८५ जण जखमी झाले होते.

दंडाधिकारी अजयकुमार शर्मा यांनी चार आरोपींना शिक्षा ठोठावली. न्यायालयाने बुधवारी मोहम्मद सैफ, मोहम्मद आझमी, मोहम्मद सलमान आणि सैफुरेहमान यांना दोषी ठरविले होते. अन्य एक आरोपी शाहबाज हुसेन याला न्यायालयाने संशयाचा फायदा देत निर्दोष ठरविले. जयपूरमध्ये १३ मे २००८ रोजी दोन कि.मी. परिसरात घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोट मालिकेने शहर हादरले होते.