नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाविरोधात रविवारी दिल्लीतील जामिया विद्यापीठाच्या परिसरात जोरदार निदर्शनं झाली व हिंसाचार उफाळला होता. या पार्श्वभूमीवर रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आलेल्या जवळपास ५० निदर्शकांना सोमवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी सोडले आहे. निदर्शकांनी रविवारी सायंकाळी अनेक बस पेटवल्या होत्या. धुमश्चक्रीत सहा पोलीस, दोन अग्निशामक जवान आणि काही विद्यार्थ्यांसह जवळपास १०० जण जखमी झाले. शिवाय,हिंसाचारामुळे मेट्रो रेल्वेची पाच स्थानकेही बंद करण्यात आली. विद्यापीठाच्या आवारातून पोलिसांवर दगडफेक होत होती, त्यामुळे निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा मारा करावा लागला, यानंतर पोलिसांना काही उपद्रवी शक्तींनी विद्यापीठात घुसखोरी केल्याच्या संशय आल्याने त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या आवाराच्या बाहेर काढले. शिवाय पोलिसांनी काही निदर्शकांना देखील ताब्यात घेतले होते. MS Randhawa, PRO Delhi Police: All detained students have been released from Kalkaji and New Friends Colony. pic.twitter.com/1Plzfp3tfV — ANI (@ANI) December 15, 2019 तर दुसरीकडे विद्यापीठ प्रशासन व विद्यार्थांचा आरोप आहे की, पोलिसांनी त्यांच्याबरोबर अमानुषता केली आहे. रात्री ९ वाजेपासून पोलीस मुख्यालयाबाहेर विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होते. ताब्यात घेण्यात आलेल्यांची सुटका झाल्यावर विद्यार्थी मुख्यालयातून माघारी फिरले.