भारत-पाकिस्तान सीमेवर शनिवारी रात्री पुन्हा एकदा दहशतवाद्यांशी सुरक्षा रक्षकांची जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन लष्करी अधिकाऱ्यांसोबत तीन जवान शहीद झाले आहेत. तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं आहे. कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये सुमारे आठ तास ही धुमश्चक्री सुरु होती. एएआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.

शहीदांमध्ये २१ राष्ट्रीय रायफल्सच्या युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अशुतोष शर्मा यांचा समावेश आहे. शर्मा यांनी यापूर्वी अनेक यशस्वी काउंटर टेररिझम मोहिमांमध्ये महत्वाची भुमिका बजावली होती.

कुपडावा जिल्ह्यातील हंदवाडा शहरातील चांगिमुला येथे काही स्थानिक नागरिकांना दहशतवादी बंदी बनवणार आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिली होती. त्यानुसार, या ठिकाणी लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची संयुक्त मोहिम राबवण्यात आली.

हंदवाडा मोहिमेच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, दहशतवादी घुसलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराचे ५ जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक जवान अशा सहा जणांची टीमने इथं प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी इथल्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेरही काढलं. दरम्यान, इथं लपून बसलेल्या दहशतवाद्यांना जवानांची चाहूल लागल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरु केला. जवानांनीही याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले. मात्र, आपल्या दोन लष्करी अधिकाऱ्यांसह दोन जवान आणि एक जम्मू-काश्मीर पोलीसांचा सब इन्पेक्टर असे पाच जण शहीद झाले.