दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील अमरनाथ यात्रेला जात असलेल्या भाविकांना आणि पर्यटकांना परतण्याचे आदेश केंद्र सरकाने शुक्रवारी दिले. या निर्णयावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांना आणि पर्यटकांना अमरनाथ यात्रा सोडावी लागण्याचा घेण्यात आलेला निर्णय संतापजनक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, केंद्र सरकार आणि आपले लष्कर नक्कीच दहशतवाद्यांचा खात्मा करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून अमरनाथ यात्रेत मोठा घातपात केला जाण्याची शक्यता असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने शुक्रवारी दिल्यानंतर जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने अमरनाथ यात्रा रद्द केली. यात्रेकरू तसेच पर्यटकांनी शक्य तितक्या तातडीने काश्मीर सोडावे, असे सूचनावजा आदेशही प्रशासनाने दिले होते. घातपाताच्या शक्यतेबाबत मिळालेला तपशील चिंताजनक आहे. त्याची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे ही यात्राच रद्द केली जात असल्याचे अधिकारी सूत्रांकडून सांगण्यात आले. एक जुलैला सुरू झालेली ही यात्रा 15 ऑगस्टला पूर्णत्वास जाणार होती. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून संताप व्यक्त केला आहे. सरकारचा हा निर्णय राग आणणारा असल्याचे ते म्हणाले.

दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची तसेच कोणत्याही प्रकारच्या धमक्यांना न घाबरण्याची ताकद आपल्यात आहे. प्रत्येक पर्यटकाच्या आणि भाविकाच्या सुरक्षेची जबाबदारी योग्यरित्या पार पाडली जाईल, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. अमरनाथ यात्रा 15 ऑगस्ट रोजी पूर्णत्वास जाणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील यापूर्वी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून अमरनाथ यात्रेत मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होत असल्याचे म्हटले होते.