जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांनी शस्त्रसाठाही जप्त केला आहे.

अनंतनागमधील बिजबेहरा येथे सुरक्षा दलाच्या गस्तीपथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. यानंतर परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. यावर सुरक्षा दलांनाही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सफदर अमिन भट आणि बुरहान अहमद गनी अशी या मृत दहशतवाद्यांची नावे आहेत.

दरम्यान, जानेवारीपासून एप्रिलपर्यंत सुरक्षा दलांनी जम्मू- काश्मीरमध्ये एकूण ६९ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तर १२ जणांना अटक केली आहे. पुलवामा येथील हल्ल्यानंतर राज्यात ६८ दिवसांमध्ये एकूण ४१ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.