जम्मू-काश्मीरमध्ये वाढणाऱ्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. राज्यात दहशतवाद पसरवण्याचा 'धंदा' बंद करा. शांतता नांदू द्या, असे त्यांनी पाकिस्तानला सांगितले आहे. दूरू येथील एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना त्या बोलत होत्या. दहशतवादाला खतपाणी घालणे बंद करा, येथे शांतता राहू द्या, असे त्या म्हणाल्या. राज्यात बेरोजगारीचा विषय गंभीर बनला असून सर्वात मोठे आव्हान आहे. त्यावर ठोस उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग आणि श्रीनगरमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. श्रीनगर मतदारसंघातून मेहबुबा यांचे बंधू तसद्दुक हुसैन सईद निवडणूक लढवत आहेत. त्यांची लढाई मुख्यतः काँग्रेसचे उमेदवार जी. ए. मीर यांच्याशी आहे. त्यांना राज्यातील विरोधी पक्ष नॅशनल कॉन्फरन्सनेही पाठिंबा दिला आहे. यापूर्वी सोमवारी मुफ्ती यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवरील दगडफेक प्रकरणावर वक्तव्य केले होते. काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक करणाऱ्या तरुणांमध्ये कमालीची निराशा आहे. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले होते. आपल्या मुलांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. ते दुःखी आहेत. त्यांच्यात निराशा आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.