उत्तर प्रदेशातील हाथरस येथे १९ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. दिल्लीमधील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान या पीडित मुलीला आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर सध्या सर्व देशात संतापाचं वातावरण आहे. त्यातच उत्तर प्रदेश पोलिसांनी कुटुंबियांना पीडित मुलीचं शेवटचं दर्शनही न घेऊ देता थेट अंत्यसंस्कार केल्यामुळे लोकांच्या संतापात आणखी भर पडली आहे. सर्व विरोधी पक्ष उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे.

राज्यसभेचे माजी खासदार आणि प्रख्यात गीतकार-लेखक जावेद अख्तर यांनी नाव न घेता हाथरस प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. इच्छा असली की मार्ग मिळतो हे आपण ऐकलं होतं. पण इच्छाच नसेल तर समिती स्थापन केली जाते, अशा आशयाचं ट्विट करत अख्तर यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

दरम्यान, पीडित तरुणीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामधून काही महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा झाला आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पीडितेच्या मणक्याला फ्रॅक्चर झाला होता. तसंच तिचा गळा दाबण्यात आला होता. महत्त्वाचं म्हणजे ‘अंतिम निदान’मध्ये बलात्कार झाला आहे याला दुजोरा देण्यात आलेला नाही. दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयानेच शविवच्छेदन अहवाल तयार केला आहे. उपचारासाठी पीडितेला अलिगड रुग्णालयातून सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. शवविच्छेदन अहवालानुसार, मणक्याला फ्रॅक्चर झाला असताना रक्तस्त्रावदेखील झाला होता.

यासोबत पीडितेच्या गळ्यावर आढलेल्या खुणा तिचा गळा दाबल्याचं स्पष्ट करत असल्याचंही अहवालात नमूद आहे. पीडितेचा गळा दाबवण्यात आला असला तरी त्यामुळे मृत्यू झाला नसल्याचाही अहवालात उल्लेख आहे. व्हिसेराच्या आधारे मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल असं अहवालात सांगण्यात आलं आहे. व्हिसेरा जपून ठेवण्यात आलं असून इतर महत्त्वाचे नमुने तपास अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आल्याचं रुग्णालयाने सांगितलं आहे.