भारत सरकारने काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला. अनेक वेळा हे कलम रद्द करण्याच्या चर्चा करण्यात आल्या होत्या, पण अखेर २०१९ मध्ये भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी हा निर्णय जाहीर केला. भारताचा हा निर्णय पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला. पाकिस्तानचे धाबे दणाणल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान, इतर केंद्रीय मंत्री आणि काही पाकिस्तानी सेलिब्रिटी यांनी या मुद्द्यावरून आपली टोकाची मतं मांडली. नुकतेच पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार जावेद मियांदाद याने अण्वस्त्रांसंबंधी दर्पोक्ती केली होती. त्यातच आता मियांदादने पुन्हा एक चिथावणीखोर वक्तव्य केले आहे.

“काश्मीरी बांधवांनो, तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. माझ्या हातात जेव्हा बॅट होती तेव्हा मी षटकार मारले होते. आता तलवार चालवेन. मी पहिले बॅटने षटकार लगावले आहेत, तर तलवारीने माणसं मारू शकत नाही का?”, असे चिथावणीखोर वक्तव्य जावेद मियांदाद याने केले आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, या आधी देखील मियांदाद याचा काश्मीर मुद्द्यावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये त्यांनी भारताला अण्वस्त्र वापरून बेचिराख करून टाकू अशी गरळ ओकली होती. “भारताचे पंतप्रधान मोदी यांना आम्ही अनेकदा ताकीद दिली आहे. भारतातील लोक हे भित्रे आहेत. पण आमच्याकडे जी अण्वस्त्रे आहेत, ती आम्ही केवळ दाखवण्यासाठी ठेवलेली नाहीत. आम्ही केवळ संधीची वाट पाहत आहोत. आम्ही वापर करण्यासाठीच ती अण्वस्त्र घेतलेली आहेत. त्यामुळे संधी मिळताच अण्वस्त्र वापरून भारताला साफ करून टाकू”, अशी दर्पोक्ती जावेद मियांदादने केली होती.