बॉलिवूड इंडस्ट्रीला काही लोकं बदनाम करत असल्याचं वक्तव्य समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत केलं. सभागृहात शून्य प्रहराला त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीचा मुद्दा मांडला. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीला आणि त्यातील कलाकारांना टीका करणाऱ्यांची एक लाटच सोशल मीडियावर उसळली. याबद्दल जया बच्चन यांनी संताप व्यक्त केला आहे.

“मनोरंजन विश्वातील लोकांना सोशल मीडियावर वाटेल ते बोललं जातंय. ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणतायत. माझा याला पूर्ण विरोध आहे. लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये असं सरकारकडून सांगण्यात यावं अशी मी आशा करते. इंडस्ट्रीने नेहमीच चांगल्या उपक्रमांसाठी सरकारला मदत करायला पुढाकार घेतला आहे. आता सरकारने इंडस्ट्रीला पाठिंबा द्यावा”, असं त्या म्हणाल्या. याआधी अभिनेत्री कंगना रणौतने बॉलिवूडला ‘गटार’ म्हटलं होतं. इंडस्ट्रीत काम करणारे ९९ टक्के कलाकार हे ड्रग्सच्या अधीन गेल्याचं वक्तव्य कंगनाने केलं होतं.

भाजपा खासदार रवी किशन यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर त्या पुढे म्हणाल्या, “केवळ काही लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीचं नाव खराब होऊ शकत नाही. चित्रपटसृष्टीत काम करणारे लोकसभेचे एक सदस्य काल इंडस्ट्रीविरोधात बोलत होते. हे लज्जास्पद आहे.” रवी किशन यांनी लोकसभेत इंडस्ट्रीतील कलाकारांकडून ड्रग्स सेवनाचा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्याविषयी चौकशीची मागणी केली होती. यावरूनच “ज्या ताटात खातात, त्याच ताटात नंतर छेद करतात”, अशा शब्दांत जया बच्चन यांनी टीका केली.

सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्सचाही मुद्दा समोर आला. ड्रग्स प्रकरणावरून इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांवर निशाणा साधला जात आहे. इंडस्ट्रीची प्रतिमा मलिन केली जात असल्याची भावना काही कलाकारांनी व्यक्त केली. दुसरीकडे इंडस्ट्रीचं ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर त्याविषयी टिकाटिप्पणींची लाटच सोशल मीडियावर उसळली आहे. या सर्व गोष्टींविरोधात जया बच्चन यांनी राज्यसभेत वक्तव्य केलं.