झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजापाचे झारखंड प्रभारी ओम प्रकाश माथूर यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठका सुरू आहे. बैठकीत झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांची देखील उपस्थिती आहे. झारखंडमध्ये ३० नोव्हेंबर ते २० डिसेंबर दरम्यान पाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे. Delhi: Jharkhand BJP Core Committee meeting is underway at the residence of party's Jharkhand in-charge, Om Prakash Mathur. Jharkhand CM Raghubar Das is also present at the present meeting; Jharkhand will go to polls from November 30 to December 20. — ANI (@ANI) November 7, 2019 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच शनिवारी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत उमेदवारांची निश्चिती होणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी नामांकन प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष व गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंह, थावरचंद गहलोत, भाजपाचे संघटन सरचिटणीस बीएल संतोष, शाहनवाज हुसैन आदींची उपस्थिती असणार आहे. येथील ८१ विधानसभा मतदारसंघासाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ डिसेंबरला मतमोजणी असणार आहे. राजकीय पक्षांना बहुमतासाठी ४१ चा आकडा पार करावा लागणार आहे. निवडणुकीचा दुसरा टप्पा ७ डिसेंबर, तिसरा टप्पा – १२ डिसेंबर, चौथा टप्पा – १६ डिसेंबर आणि शेवटचा पाचवा टप्पा २० डिसेंबर रोजी पार पडणार आहे. २०१४ मध्ये झारखंडमध्ये चार टप्प्यात निवडणूक पार पडली होती, तेव्हा भाजपाला सर्वाधिक ३७ जागा मिळाल्या होत्या. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२० संपुष्टात येणार आहे. झारखंडमधील एकूण मतदारांची संख्या २.२६ कोटी आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी पत्रकारपरिषदेद्वारे याबाबत माहिती दिली आहे. झारखंडमधील ८१ मतदारसंघापैकी ६७ मतदारसंघ हे नक्षलग्रस्त आहेत. शिवाय १९ जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. झारखंडमध्ये पहिल्यांदाच दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना घरी बसून पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येणार आहे. त्यांना घराशेजारी ईव्हीएमवर जाऊन मतदान करायचे नसेल तर पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याचा पर्याय त्यांना देण्यात आला आहे. निवडणूक आयोग झारखंडबरोबरच दिल्ली विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम देखील घोषित करले, असे वाटत होते . मात्र आयोगाने केवळ झारखंडच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २२ फेब्रुवारी २०२० रोजी संपुष्टात येणार आहे.