झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील दानुआ घाटीत सोमवारी पहाटे एका खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील ११ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग दोन वर हा अपघात घडला. बसचे ब्रेक फेल झाल्याची माहिती मिळत आहे.

झारखंडच्या राची मधून निघालेली ही बस बिहारमधील गया येथे चालली होती. पहाटे तीनच्या सुमारास या बसने लोखंडी रॉडने भरलेल्या ट्रेलरला धडक दिली. बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडला. धडक इतकी जोरदार होती कि, बसच्या चालकासह ११ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

पहाटेच्या समयी प्रवासी गाढ झोपेत असताना मृत्यूने त्यांना गाठले. हजारीबागचे उपायुक्त रविशंकर शुक्ला यांच्या देखरेखीखाली घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. सर्व जखमींना चौपारण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.