काश्मिरात दहशतवाद्यांनी केलेल्या दुहेरी हल्ल्याचा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांतता प्रयत्नांवर परिणाम होणार नसून न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी ठरलेली भेट नियोजित वेळापत्रकानुसारच होईल असे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान गुरुवारीच न्यूयॉर्कला रवाना झाले. रविवारी त्यांची नवाझ शरीफ यांच्याशी भेट होणार आहे. शरीफ-सिंग यांच्यात चर्चा होऊ नये यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. याच पाश्र्वभूमीवर गुरुवारी तीन दहशतवाद्यांनी कथुआ जिल्ह्य़ातील हिरानगर पोलीस ठाणे व सांबा क्षेत्रातील लष्करी तळाला लक्ष्य केले. या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी शांतता चर्चा यापुढेही सुरूच ठेवून दहशतवादाशी निकराने लढण्याच्या भारताच्या निर्धाराचा पुनरुच्चार केला. ट्विटरवरून सिंग यांनी संपूर्ण घटनाचक्रावर आपली प्रतिक्रिया नोंदवली. हल्ल्याचा जेवढय़ा कठोर शब्दांत निषेध व्यक्त करू तेवढा कमीच आहे. मात्र, अशा घटनांनंतरही आम्ही आमच्या निर्धाराला तडा जाऊ देणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
जम्मूत पोलिस स्थानक, सैन्य छावणीवर अतिरेकी हल्ला; लेफ्टनंट कर्नल सह १२ जणांचा मृत्यू
नवाझ भेटीत काय होणार..
या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर रविवारी मनमोहन सिंग आणि नवाझ शरीफ यांची भेट होणार आहे. पंतप्रधानपदी नियुक्ती होताच शरीफ यांनी भारताशी सौहार्दपूर्ण संबंध राखण्यावर आपल्या सरकारचा भर असेल असे स्पष्ट केले होते.
मनमोहन, नवाझ भेट: २६/११ हल्ल्याची पाकिस्तानने जबाबदारी स्विकारावी! – भारत
चर्चाच करू नका
हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधानांनी शरीफ यांच्याशी चर्चाच करू नये, अशी आग्रही मागणी भाजपने केली आहे. सरकार कणाहीन धोरणांचा अवलंब करीत असल्याचा आरोपही केला आहे.  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे. पाकिस्तानातील भारतविरोधी शक्तींकडून अशा प्रकारचे हल्ले केले जात आहेत, असेही ते म्हणाले.  चर्चेसाठी पोषक वातावरण तयार होईपर्यंत पाकिस्तानशी चर्चा करू नये, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

चर्चा हा एकमेव मार्ग : ‘हा प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा हा एकमेव मार्ग आहे’, काँग्रेसने गुरुवारी म्हटले आह़े या हल्ल्याचा निषेध करताना काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी, पाकिस्तानला या घातक घटकांना आवरण्याची सूचना केली आह़े  भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश दहशतवादाचे बळी आहेत़  त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी दोघांनी एकत्र येऊन लढा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केल़े  त्यासाठी चर्चा हे एकमेव माध्यम असल्याचेही दिग्विजय यांनी ट्विटरवर म्हटले आह़े काँग्रेस प्रवक्त्यांनी याबाबत तातडीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली, तरीही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रशीद अल्वी यांनी यावर आपले मत व्यक्त केले आह़े भारताला पाकिस्तानशी चांगले संबंध हवे आहेत़  परंतु, अशा अतिरेकी घटनांची किंमत मोजून नाही, असे ते म्हणाल़े  

दहशतवाद्यांचे काश्मिरातील कृत्य अत्यंत घृणास्पद आहे. शांततेच्या विरोधकांनीच हा हल्ला घडवून आणला आहे. मात्र, अशा हल्ल्यांनंतरही शांततेसाठी प्रयत्नरत राहण्याचा आमचा निर्धार कायम राहील. हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांच्या दु:खात संपूर्ण देश सहभागी आहे.