केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मू-काश्मीरमधील जमीन संबंधीच्या कायद्यात बदल करत, आज अधिसूचना काढत आज मोठा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार आता भारतातील कोणताही व्यक्ती जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन खरेदी करू शकणार आहे. शिवाय, त्या ठिकाणी वास्तव्य देखील करू शकणार आहे. तर, मोदी सरकारच्या या निर्णयावर माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ''जम्मू-काश्मीरमधील जमिनींच्या मालकी हक्काबाबतच्या कायद्यात अस्वीकार्य बदल करण्यात आले आहेत. आता बिगर शेत जमिनीसाठी स्थानिक असल्याचा पुरावा देखील द्यावा लागणार नाही. याचबरोबर शेतजमीनींचे हस्तांतरण अधिकच सोपे केले आहे. आता जम्मू-काश्मीर विक्रीसाठी तयार आहे. गरीब जमीनधारकांना यामुळे अधिक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे.'' असं ओमर अब्दुल्ला ट्विटद्वारे म्हणाले आहेत. Unacceptable amendments to the land ownership laws of J&K. Even the tokenism of domicile has been done away with when purchasing non-agricultural land & transfer of agricultural land has been made easier. J&K is now up for sale & the poorer small land holding owners will suffer. — Omar Abdullah (@OmarAbdullah) October 27, 2020 गृहमंत्रालयाने हा निर्णय जम्मू-काश्मीर पुनर्गठन अधिनियम अंतर्गत घेतला आहे. यानुसार आता कोणताही भारतीय जम्मू-काश्मीरमध्ये कारखाना, घर किंवा दुकानासाठी जमीन खरेदी करू शकतो. यासाठी त्याला स्थानिक असल्याचा पुरावा देण्याची आवश्यकता नसणार आहे. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा याबाबत माहिती देताना म्हणाले की, बाहेरचे उद्योग जम्मू-काश्मीरमध्ये यावेत अशी आमची इच्छा आहे. यासाठी औद्योगिक जमिनीत गुंतवणुकीची आवश्यकता आहे. मात्र, शेतजमिनी केवळ राज्यातील लोकांकडेच राहातील. या अगोदर जम्मू-काश्मीरमध्ये केवळ स्थानिक लोकचं जमिनीच खरेदी-विक्री करू शकत होते. मात्र, मोदी सरकारच्या या नव्या निर्णयानुसार आता राज्याबाहेर लोकांना देखील या ठिकाणी जमीन खरेदी करता येणार आहे. केंद्र सरकारने मागील वर्षी कलम ३७० हटवले होते. यानंतर ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनले होते. आता याच्या एका वर्षानंतर येथील जमिनीच्या कायद्यात बदल करण्यात आला आहे.