पाकिस्तानी सैनिकांनी शनिवारी रात्री १५ भारतीय चौक्यांना लक्ष्य केले. तसेच काही गावांवरही त्यांनी गोळीबार केला. गोळीबारात यामध्ये तीन जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
बीएसएफच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार,  शनिवारी रात्री पाकिस्तानकडून गोळीबारास सुरुवात करण्यात आली. पाकिस्तानी सैनिकांनी रात्रभर अरनिया आणि आरएसपूरा सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. यामध्ये १५ भारतीय चौक्यांना लक्ष्य करण्यात आले. तसेच, सीमेलगतच्या गावांवरही त्यांनी हल्ला चढविला. भारतीय सैन्याकडूनही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. शनिवारी संध्याकाळीही पाकिस्तानी सैन्याने चार भारतीय चौक्यांवर गोळीबार केला होता.
गेल्या काही दिवसांपासून पाक सैन्याकडून सीमेवरील भारतीय चौक्या व गावांवर होत असलेल्या गोळीबारामुळे हजारो नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. आतापर्यंत आठ नागरिकांचा मृत्यू झाला असून, ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.