भारत चीन सीमेवर पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये १५ जून रोजी झालेल्या हिसेंमध्ये २० भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी चीनचा निषेध करत चिनी मालावर बंदी घालण्याची मागणी करण्यासाठी आंदोलनेही झाली. सरकारी स्तरावरही चिनी कंपन्यांना हद्दपार करण्यासाठी हलचाली सुरु झाल्या आहेत. केंद्र सरकारने ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याबरोबरच रेल्वे, रस्ते वाहतूक आणि दूरसंचार क्षेत्रामध्ये चिनी कंपन्यांच्या कंत्रांटवर बंदी घालणे, स्थगिती देणे असे निर्णय मागील काही दिवसांमध्ये घेतले आहेत. मात्र सरकारी पातळीवर सुरु असणारी चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची ही मोहीम आता कॉर्पोरेट कंपन्यांपर्यंत पोहचली आहे.

चिनी मालावर बहिष्कार टाकण्याच्या मोहीमेमध्ये आता जेएसडब्ल्यू या बड्या कंपनीने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. चिनीमधून होणारी आयात पुढील दोन वर्षांमध्ये पूर्णपणे बंद करण्याचे उद्दीष्ट कंपनीने डोळ्यांसमोर ठेवलं आहे. कंपनीच्या सिमेंट आणि पेंट विभागाचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ जिंदाल यांनी यासंदर्भात ट्विटवरुन माहिती दिली आहे.

“चीनने भारतीय भूभागावर हल्ला करुन आपल्या शूर जवानांवर हल्ला करुन आम्हाला जागं केलं आहे. याच संदर्भात निर्णय घेताना जेएसडब्ल्यू ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी ४०० बिलियन डॉलरचा माल आयात होतो. ही आयात आम्ही पुढील २४ महिन्यांमध्ये शून्यावर आणून अशी आम्ही प्रतिज्ञा करतो,” असं पार्थ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. म्हणेज जिंदाल ग्रुप दरवर्षी चीनमधून आयात करणाऱ्या वस्तूंची किंमत ही अंदाजे २९०० कोटी असून कंपनी टप्प्याटप्प्यात चीनवर अवलंबून राहणं कमी करणार आहे. आत्मनिर्भर होत जिंदल ग्रुप चीनमधून पुढील दोन वर्षात आयात पूर्णपणे बंद करण्याच्या विचारात असल्याचे पार्थ यांनी स्पष्ट केलं आहे.

जेएसडब्ल्यू ग्रुपचे संचालक सज्जन जिंदाल यांचे पुत्र असणारे पार्थ हे कंपनीच्या सिमेंट आणि रंग उद्योगाचे व्यवहार पाहतात. जेएसडब्ल्यू ग्रुप हा स्टील, सिमेंट आणि ऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये काम करते.