‘भारथ’ आणि ‘संध्या’ या दाक्षिणात्य हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारा अभिनेता विरुत्छगाकांत बाबू (Virutchagakanath)चे निधन झाले आहे. २४ मार्च रोजी अभिनेत्याचा चैन्नईमधील एका रिक्षामध्ये मृतदेह सापडला आहे. पण अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याचे झोपेतच निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्याची आर्थिक परिस्थिती खालावली होती. चित्रपटांमध्ये काम मिळत नसल्यामुळे त्याच्याकडे राहण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. काही दिवसांपूर्वी त्याला मंदिराबाहेर पाहिले होते. तसेच आई-वडिलांच्या निधनानंतर त्याला मोठा धक्का बसला होता. आर्थिक परिस्थिती खालवल्यामुळे त्याला रिक्षात रहावे लागत होते.

काही वर्षांपूर्वी कोरिओग्राफर साई धीना यांनी अभिनेत्याला चैन्नईमधील एका मंदिरा बाहेर पाहिले होते. त्यानंतर साई यांनी त्याला घरी आणले. त्यानंतर सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याला चित्रपटात पुन्हा काम करण्याची संधी देत असल्याचे त्यांनी म्हटले होते. पण आज अखेर अभिनेत्याचे निधन झाल्याचे समोर आले आहे.