मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला हिमाचल प्रदेश सरकारनं सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला असतानाच मोदी सरकारकडून Y+ श्रेणीतील सुरक्षा देण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. त्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटलं होतं. शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. त्यानंतर गृह मंत्रालयाने तिला Y+श्रेणीतील सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे.

मुंबईविषयी वक्तव्य करणाऱ्या कंगनावर अनेक स्तरांमधून टीका होत आहे. तसंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील कंगनाला खडे बोल सुनावले आहेत. त्यामुळेच त्यांना प्रत्युत्तर देत कंगनाने ९ सप्टेंबरला मुंबई येणार असल्याचं ठरवलं आहे. मात्र, तिच्या वक्तव्यामुळे अनेक जण नाराज झाले आहेत. त्यामुळे तिच्या सुरक्षेची बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारनं सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा- कंगनाच्या सुरक्षेसाठी खास कमांडोजची होणार तैनाती, काय असतं X, Y, Z सुरक्षा कवच

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. या प्रकारानंतर मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळलं. विशेष म्हणजे या परिस्थितीमध्ये हिमाचल प्रदेश सरकारनेदेखील कंगनाला सुरक्षा दिली आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारने सुरक्षा दिल्याचं पाहायला मिळत आहे.