काँग्रेस हा चोरांचा पक्ष असून या पक्षात प्रामाणिकपणा आणि कामाला स्थान नाही अशी टीका काँग्रेस आमदार केएन रंजना यांनी केली आहे. मी या पक्षासाठी अथक मेहनत घेतली, पण आम्हाला पक्षात मान दिला जात नाही अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. महाराष्ट्रात गुरुवारी नारायण राणे यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका करतानाच पक्षाला रामराम केला होता. काँग्रेसमधील ही नाराजी आता अन्य राज्यांमध्येही दिसून येत आहे. कर्नाटकमधील काँग्रेस आमदार केएन रंजना यांनी एका कार्यक्रमात पक्षातील कार्यपद्धतीवर टीका केली. काँग्रेस हा चोरांचा पक्ष आहे. या पक्षात कामाचा आदर केला जात नाही. मी आणि अन्य नेत्यांनी पक्षासाठी जे काम केले त्याची दखल घेतली जात नाही. प्रामाणिकपणा आणि चिकाटीला या पक्षात स्थान नाही असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात नारायण राणे यांनीदेखील गुरुवारी काँग्रेसमधील कार्यपद्धतीवर टीका केली होती. काँग्रेसचे राज्यातील प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे पक्ष संपवत असून राज्यातून काँग्रेसचे दुकान बंद होणार असे त्यांनी म्हटले होते. देशात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली असून काँग्रेस नेतृत्वानेही याची तयारी सुरु केली आहे. राहुल गांधी यांनी परदेश दौऱ्यात केंद्र सरकारवर टीका करुन सत्ताधाऱ्यांची कोंडी केली आहे. अशा स्थितीत पक्षातील नेत्यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान राहुल गांधींसमोर आहे.