*  सत्ताधारी भाजपची धुळधाण   *  काँग्रेसला एकहाती सत्ता

काँग्रेसने कर्नाटकात भारतीय जनता पक्षाला चारी मुंडय़ा चीत करून सात वर्षांच्या खंडानंतर बुधवारी दिमाखदार पुनरागमन केले. आपला एकेकाळचा बालेकिल्ला पुन्हा काबीज करताना पक्षाने स्पष्ट बहुमत मिळविले.

पक्षांतर्गत लाथाळ्या आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे यामुळे दुबळ्या झालेल्या सत्ताधारी भाजपची राज्यात धुळधाण उडाली. याउलट राष्ट्रीय राजकारणात विविध घोटाळ्यांच्या आरोपांमुळे त्रस्त झालेल्या काँग्रेसला या विजयामुळे दिलासा मिळाला आहे. विधानसभेच्या २२४ जागांपैकी ११८ जागांवर काँग्रेसने विजय मिळविला. यामुळे आता पक्षाला आघाडीसाठी मित्र पक्ष शोधण्याकरीता धावाधाव करावी लागणार नाही. गेल्या वेळच्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसने आपले बळ सुमारे ४५ जागा अधिक मिळवून वाढविले.

येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक जनता पक्षाने भारतीय जनता पक्षाची धुळधाण होण्यास मोठा हातभार लावला असला तरी या पक्षाला अवघ्या सात जागांवर समाधान मानावे लागले आहे.

समाजवादी पक्षाला राज्यात एका जागेवर विजय मिळाला आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात जगदीश शेट्टार सरकारचा राजीनामा देणारे मंत्री सी. पी. योगेश्वर यांनी या पक्षाला चन्नापट्टा मतदारसंघात यश मिळवून दिले. त्यांनी प्रदेश जनता दल धर्मनिरपेक्षचे अध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता कुमारस्वामी यांचा  ६५०० मतांनी पराभव केला.

मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असलेले प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जी. एस. परमेश्वर यांचा कोराटगेरे मतदारसंघातील पराभव काँग्रेससाठी धक्कादायक ठरला. शेट्टार मंत्रिमंडळातील १२ मंत्र्यांना मतदारांच्या नाराजीने पराभवाची चव चाखावी लागली. त्यात त्यात उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांचाही समावेश आहे. त्यांच्या पराभवाने भाजपच्या जखमेवर जणू मीठच चोळले गेले.

भाजपची कामगिरी पक्षाचे बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या भागांतही निराशाजनक झाली. दक्षिण कन्नडा, उडुपी या तटवर्ती जिल्ह्य़ांनीही पक्षाला साथ दिली नाही. येडियुरप्पा यांचा प्रभाव असलेल्या शिमोगा आणि बेळ्ळारी या जिल्ह्य़ांमध्येही पक्षाची डाळ शिजली नाही.

भाजप ११० वरुन ३७

दक्षिणेतील एकमेव राज्यातील सत्ता भाजपला गमवावी लागली. माजी मंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची बंडखोरी पक्षाला महाग ठरली. याचबरोबर लागोपाठच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे पक्षाची प्रतिमाही मलीन झाली होती. पाच वर्षांपूर्वी विधानसभेच्या ११० जागा जिंकण्याची कामगिरी करणाऱ्या या पक्षाला अवघ्या ३७ जागाच जिंकता आल्या.

 

जेडीयुला लाभ

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या जनता दल धर्मनिरपेक्षने २००८ मध्ये २८ जागा जिंकल्या होत्या. त्यात दहा जागांची भर पडली आहे. प्रमुख विरोधी पक्षाच्या दर्जासाठी या पक्षाची भाजपशी स्पर्धा आहे.