करोनाचा वाढता धोका लक्षात घेत कर्नाटक सरकारनं गुरूवारी मोठा निर्णय घेतला. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांमुळे संसर्ग वाढण्याची भीती असल्यानं कर्नाटक सरकारनं महाराष्ट्रासह पाच राज्यातून होणारी विमान, रेल्वे आणि इतर वाहनातून होणारी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक थांबवली आहे.

देशात करोनामुळे अनेक राज्यांची स्थिती गंभीर आहे. कर्नाटकातील परिस्थिती नियंत्रणात असून, आतापर्यंत २ हजार २८३ रुग्ण कर्नाटकात आढळून आले आहेत. विशेष म्हणजे हळूहळू सर्व सेवा सुरू करण्याची तयारी कर्नाटकातील येडियुरप्पा सरकारकडून सुरू आहे. दरम्यान, प्रवासी वाहतुकीमुळे करोना प्रसाराचा वाढता धोका लक्षात घेऊन कर्नाटक सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.

करोनामुळे सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यातून होणारी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक कर्नाटकनं थांबवली आहे. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यातून रेल्वे, विमान आणि इतर वाहनातून होणारी वाहतूक रद्द केली आहे.

देशात लॉकडाउनला चौथ्या टप्प्यात मुदत वाढ दिल्यानंतर केंद्र सरकारनं अनेक बंधनं शिथिल केले आहेत. यात जीवनावश्यक असलेल्या आणि नसलेल्या वस्तुंची दुकानं सुरू करण्यास केंद्रानं परवानगी दिली. त्याचबरोबर विशेष श्रमिक रेल्वे गाड्या सोडल्यानंतर मर्यादित स्वरूपात रेल्वे वाहतुकही सुरू केली. विमान वाहतुकीलाही २५ मेपासून प्रारंभ झाला आहे. मात्र, यामुळे करोनाचा प्रसार होण्याची भीतीही अनेक राज्यांनी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनं हा निर्णय घेतला आहे.