नुकताच लष्कराच्या कारवाईत हिजबूल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वानी ठार झाला होता. त्याच्या मृत्यूचे पडसाद काश्मीर खोऱ्यात अद्याप उमटत आहेत. सीआरपीएफ आणि लष्कराने दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या गोळीबारात पाच आंदोलक ठार झाले. मृतांचा आकडा ६५ वर पोहोचला आहे. मंगळवारी (दि. १६) मध्य काश्मीर येथील बेरवाह व अनंतनाग जिल्ह्यातील लारकीपूल गावात घडली.
मंगळवारी सकाळी बेरवाह येथे आंदोलकांनी सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक केली. त्यावेळी जवानांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात चार जण ठार तर चार जखमी झाले. पोलीस प्रशासन मात्र तिघेच ठार झाल्याचा दावा करत आहेत. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते ओमर अब्दुल्ला यांचा बेरवाह हा मतदार संघ आहे.
दुसरी घटना लारकीपूल येथे घडली. लष्कराच्या गोळीबारात येथे एक युवकाचा मृत्यू झाला. आमीर युसूफ असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याठिकाणी सुमारे दहाहून अधिक आंदोलक जखमी झाले. लष्काराने विनाकारण आंदोलकांवर गोळीबार केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.
गेल्या ३९ दिवसांपासून काश्मीर खोऱ्यातील १० जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. आंदोलनामुळे ९ जुलैपासून काश्मीर खोऱ्यातील सर्व शैक्षणिक संस्था, दुकाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे येथील जनजीवनावर परिणाम झाला आहे. मंगळवारी झालेल्या या घटनेमुळे बुऱ्हान वानीच्या मृत्यूनंतर झालेल्या आंदोलनात ठार झालेल्यांची संख्या ६५ पर्यंत पोहोचली आहे.