करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचा उपाय असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. देशात लसीकरणाला सुरवात झाली आहे. मात्र देशात लसीचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशात युद्धपातळीवर लस तयार करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. केजरीवाल यांनी आज (मंगळवार) डिजिटल पत्रकार परिषद घेतली, यामध्ये ते बोलत होते.

केजरीवाल म्हणाले, करोनाविरूद्ध लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी युद्धपातळीवर लस तयार करण्याची गरज आहे. लस तयार करण्याचे काम फक्त दोन कंपन्यांकडे आहे, ते वाढविण्यात यावे,

“सध्या आपण दररोज सव्वा लाख डोस देत आहोत, हे ३ लाख डोस रोज करण्याचे लक्ष्य आहे. परंतु एक मोठी समस्या समोर येत आहे, ती म्हणजे लस. आमच्याकडे फक्त काही दिवस पुरेल ऐवढीच लस शिल्लक आहे आणि ही समस्या देशभर आहे. अशी काही राज्ये आहेत जिथे लस नसल्यामुळे लसीकरण सुरू झाले नाही. देशात केवळ दोन लस उत्पादन कंपन्या आहेत. ज्या महिन्यात ६-७ कोटी लस बनवतात. मात्र आता लसींचे उत्पादन युद्धपातळीवर वाढवणे आवश्यक झाले आहे” असे केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल यांनी सुचवले की “लस बनवण्याचे काम फक्त दोन कंपन्यानी करू नये, अनेक कंपन्यानी लस बनवावी. लस बनवत असलेल्या दोन कंपन्यांकडून फॉर्म्युला घ्या आणि इतर कंपन्यांना द्या, ज्यांना लस तयार करायची आहे, हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे आपण शक्य तितक्या लवकर सर्व भारतीयांचे लसीकरण करण्यास सक्षम होऊ.”

यासंदर्भात केजरीवाल यांनी एक उदाहरण सुद्धा दीलं आहे. “जेव्हा भारतात करोना आला होता. तेव्हा पीपीई किटची कमतरता होती. मात्र त्यावेळी इतर कंपन्यानी पीपीई किट बनवण्यात सहभाग घेतला. त्यानंतर कमतरता जाणवली नाही. तसेच लस उत्पादक कंपन्यांच्या उत्पादनाचा एक भाग इतर कंपन्यांना रॉयल्टी म्हणून दिला जाऊ शकतो जेणेकरून त्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये.”, असे केजरीवाल म्हणाले.

दिल्लीत लॉकडाउन आणि लसीकरणावर केजरीवाल म्हणाले, “तुमच्या सहकार्याने लॉकडाउन यशस्वी झाले. दिल्लीत करोनाची प्रकरणे कमी होत आहेत. आम्ही गेल्या काही दिवसांत ऑक्सिजन बेडमध्ये वाढ केली आहे. दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये लसीकरण केले जात आहे. मी शाळेतील कर्मचारी आणि लसीकरणात गुंतलेल्या आघाडीच्या कामगारांचे आभार मानू इच्छितो.”

गेल्या २४ तासांत तीन लाख २९ हजार ९४२ करोनाबाधित आढळले

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिवसभरातील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. आकडेवारीनुसार देशातील करोना रुग्णसंख्येत घट होत असली, तरी मृत्यूंचं प्रमाण मात्र काळजी वाढवणारं आहे. देशात गेल्या २४ तासांत तीन लाख २९ हजार ९४२ करोनाबाधित आढळून आले आहेत. मोठा दिलासा देणारी बाब म्हणजे तीन लाख ५६ हजार ८२ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर ३ हजार ८७६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण करोनाबळींची संख्या दोन लाख ४९ हजार ९९२ वर पोहोचली आहे.