करोनामुळे देश अभूतपूर्व अशा परिस्थितीतून जात आहे. देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे देशातील पहिला करोनाचा रुग्ण सापडलेल्या केरळनं करोनाला निष्प्रभ केलं आहे. योग्य वेळी अचूक उपाययोजना करत केरळनं करोनाला नियंत्रणात आणलं. इतकंच नाही, तर करोनामुळे शालेय परीक्षा न घेण्याचा निर्णय इतर राज्य घेत असताना केरळनं १३ लाख शालेय विद्यार्थ्यांची परीक्षाही घेतली. विशेष म्हणजे यात एकाही विद्यार्थ्याला करोनाची लागण झाली नाही. परीक्षाच्या हंगामाला सुरूवात होण्याच्या काळातच करोनानं भारतात पाऊल ठेवलं. त्यानंतर इतर उद्योग आणि सेवांबरोबर शैक्षणिक वेळापत्रकही कोलमडले. अनेक राज्यांनी शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढच्या वर्गात बढती देण्याचा निर्णय घेतला. करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना संसर्ग होणार नाही, यादृष्टीने राज्यांनी निर्णय घेतले. दुसरीकडे करोनावर यशस्वी मात करणाऱ्या केरळनं जनजीवन पूर्वपदावर आणण्याबरोबरच शालेय विद्यार्थ्यांच्याही परीक्षा घेतल्या. केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. "१४ दिवसांपूर्वी केरळमध्ये १३ लाख विद्यार्थ्यांनी वार्षिक परीक्षा दिली. यात एका विद्यार्थ्याला करोनाची लागण झाली नाही. परीक्षेचे अत्यंत सावधपणे नियोजन करण्यात आले होते. शाळा सॅनिटाईज करण्यात आल्या. सगळ्यांना मास्क पुरवण्यात आले. थर्मल चाचणी सक्तीची करण्यात आली. तसेच फिजिकल डिस्टन्सिंगच काटेकोरपणे पाळण्यात आलं आणि मोहीम यशस्वी झाली," असं अर्थमंत्री थॉमस यांनी ट्विट करून म्हटलं आहे. 14 days ago 13 lakh school students completed school final exams in Kerala. Not a single student affected by Covid. It was meticulously planned: schools sanitised. Masks distributed to all. Thermal readings mandatory. Physical distancing ensured. Operation success.#covidkerala — Thomas Isaac (@drthomasisaac) June 15, 2020 करोनामुळे शैक्षणिक सत्राची सुरूवात करण्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. केंद्रीय मनुष्य मंत्रालयानं शाळा सुरू करण्याबाबत नियोजन केलं आहे. मात्र, गृहमंत्रालयाकडून परवानगी मिळाल्याशिवाय शाळा सुरू करता येणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे अनेक राज्यात करोनाचा प्रसार वाढला असून, शैक्षणिक सत्र सुरू होण्यास विलंब होणार असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारनं आवश्यक सावधिगिरी बाळगण्याच्या सूचना देत शैक्षणिक सत्र सुरू करण्यास परवानगी दिली आहे.