केरळमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. सत्ताधारी एलडीएफने या निवडणुकीत बाजी मारली आहे. भाजपासाठी हे निकाल संमिश्र स्वरुपाचे आहेत. पुढच्यावर्षी एप्रिल-मे महिन्यात केरळमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांना महत्त्व आहे. केरळच्या राजकारणात पाय रोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाने इथे पूर्ण ताकत लावली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत भाजपाला विद्यमान ६०० जागांवर पराभव स्वीकारावा लागला आहे. मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने १२३६ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत भाजपाने १८०० जागा जिंकल्या आहेत. आणखी वाचा- “कमलनाथ सरकार पाडण्यात नरेंद्र मोदींची होती महत्त्वाची भूमिका”; भाजपा नेत्याचा गौप्यस्फोट भाजपाचे लक्ष्य २५०० जागा जिंकण्याचे होते. मागच्या निवडणुकीत जिंकलेल्या ६०० जागा गमवाव्या लागल्यामुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी एलडीएफ-युडीएफवर एनडीएविरोधात क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप केला. आतापर्यंत ज्या भागांमध्ये फार अल्प अस्तित्व होते. तिथे भाजपाने बऱ्यापैकी जागा जिंकल्या आहेत. राज्यातील ६०० वॉडर्समध्ये भाजपा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिरुअनंतपूरममधील १०० पैकी ३२ वॉर्डमध्ये भाजपा दुसऱ्या स्थानावर आहे.