आठ ऑगस्टपासून सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आता कमी झाल्यामुळे केरळ सरकारने रेड अलर्टची सूचना मागे घेतली आहे. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही सरासरी ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस सुरूच राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. केरळमधल्या १४ पैकी ११ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. फक्त तिरुअनंतपूरम, कोल्लम आणि कासारागॉड या तीन जिल्ह्यांना रेड अलर्टमधून वगळण्यात आले होते.

दरम्यान, आतापर्यंत येथे जवळपास ३५७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर २१ हजार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पावसाचा जोर ओसरल्यामुळे मदत आणि बचाव कार्याला वेग आला आहे.
एनडीआरएफ, लष्कर, नौदल आणि कोस्ट गार्डच्या जवानांकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. केरळमध्ये एनडीआरएफच्या जवळपास १६९ टीम काम करत आहेत. २२ हेलिकॉप्टर, नेव्हीच्या ४० बोटी, कोस्ट गार्डच्या ३५ बोटींच्या सहाय्याने हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. या शिवाय स्थानीक तरुण, पोलीस आणि मच्छिमारांचीही मदत मिळत आहे.

येथील जनजिवन पूर्णतः विस्कळीत झालं असून शनिवारी पावसामुळे अजून ३३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी दिली, परिणामी मरण पावलेल्यांचा आकडा ३५० च्या वर पोहोचला आहे. अजूनही असे अनेक भाग आहेत जिथे लोक अडकून पडले आहेत. अन्न-पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून देशाच्या वेगवेगळया भागातून केरळला अन्न-पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी केरळची हवाई पाहणी केल्यानंतर ५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. दोन लाखापेक्षा जास्त लोकांनी मदत छावण्यांमध्ये आसरा घेतला आहे.

महाराष्ट्र सरकारनेही केरळला तातडीची २० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ही घोषणा केली. केरळला आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी शुक्रवारपासून महाराष्ट्र सरकार केरळ प्रशासनाच्या संपर्कात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना केरळी जनतेच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. या कठिण प्रसंगात केरळी जनतेच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहून शक्य ती सर्व मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

केरळच्या मदतीला पुणेकर धावले –
पुण्यातून केरळसाठी सात लाख लिटर पिण्याचे पाणी ट्रेनने पाठवले जाणार आहे. पूरग्रस्त परिस्थितीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पिण्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुण्यातून रेल्वेद्वारे पाणी पोहोचविले जाणार आहे. तसेच गुजरातमधील रतलाम येथून १४ लाख ५० हजार लिटर पाण्याचे वॅगन पुण्यात येणार आहे. असे एकूण २१ लाख ५० हजार लिटर पिण्याचे पाणी पुण्यातून केरळला होणार आहे. पुण्यातील घोरपडी कोचिंग कॉम्प्लेक्स येथे पाणी भरण्यात येत आहे. रतलामहून पाणी पुण्यात पोहचल्यानंतर आज शनिवारी दुपारी एक नंतर पाण्याच्या गाड्या केरळसाठी रवाना होणार आहेत.