केरळमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ८ ऑगस्ट पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत येथे ४५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. येथील वायनाड, कोझीकोड, कन्नूर, कासरगोड, मलप्पुरम, पलक्कड, इदुक्की व एरनाकुलम येथे अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा फटका विमानसेवेला बसला असून कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

केरळमध्ये गेल्या १५ दिवसांपासून पावसाने थैमान घातल्याने संपूर्ण जीवन कोलमडून गेले आहे. कोची विमानतळालगत असलेल्या पेरियार नदीवरील धरण ओव्हरफ्लो झाल्याने पाणी विमानतळाच्या धावपट्टीवर आले आहे. त्यामुळे सर्वप्रथम खबरदारी म्हणून आज दुपारी २ वाजेपर्यंत एकही विमान उड्डाण करणार नसल्याचं सांगण्यात आलं होतं. पुढील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर विमानसेवा चालु करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे कोचीन प्रशासनाने सांगितले होते. पण पावसाचा जोर कमी होत नसल्यामुळे आणि पाण्याचा निसरा न झाल्याने येथील विमानतळ प्रशासनाने शनिवारपर्यंत विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.