गुरुवायूर येथील प्रसिद्ध भगवान श्रीकृष्ण मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असा आदेश केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला दिला.न्या. टी. आर. रामचंद्रन नायर आणि न्या. के. अब्राहम मॅथ्यू यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला सदर आदेश दिला. मंदिरातील काही कर्मचाऱ्यांचे भाविकांशी वर्तन चांगले नसल्याने त्याविरुद्ध अनेक याचिका करण्यात आल्या होत्या. त्या विचारात घेऊन खंडपीठाने वरील आदेश दिले आहेत.गुरुवायूर मंदिरात एका भाविक आणि त्याच्या आईला मंदिरातील सुरक्षारक्षकांकडून जी वर्तणूक मिळाली त्याचे प्रसारण एका दूरचित्रवाणी वाहिनीवरून प्रसारित करण्यात आले. त्यावरून मंदिराच्या अधिकाऱ्यांवर टीकेची झोड उठविण्यात आली होती.दरम्यान, भाविकावर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या तक्रारीनंतर मंदिर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली असून भाविकावर हल्ला करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे, असे राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले.सदर मंदिराच्या प्रशासकपदी सनदी अधिकारी नियुक्त करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, असेही सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले आहे. काही सुधारणा सुचविण्यासाठी न्या. एम. एन. कृष्णन यांचा चौकशी आयोग नियुक्त करण्यात आला आहे.