केरळमधील जलप्रलयानंतर आता याठिकाणी आणखी एका गोष्टीची भिती निर्माण झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून पडत असणाऱ्या पावसामध्ये अनेकांचे प्राण गेल्यानंतर आता याठिकाणी काही आजारांचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. मागच्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरीही अजूनही बचावकार्य सुरु आहे. अनेकांचे जीव वाचविण्यात सुरक्षा दलाला यश येत आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून याठिकाणी नागरिकांना काही आजार झाल्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या २० लाख लोकांना आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पूरात अडकलेल्या नागरिकांना पुरेसे अन्न आणि स्वच्छ पाणी मिळत नसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. यामध्ये लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वच वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. आता या ठिकाणहून ३ जणांना कांजिण्यांचा संसर्ग झाल्याने वेगळे ठेवण्यात आले असल्याचे आपतकालिन व्यवस्थापन यंत्रणेतील अनिल वासुदेवन यांनी सांगितले. प्रदुषित पाणी आणि वातावरणातील बदल यामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची मोठी शक्यता असून या आजारांपासून बचाव करण्यासाठी आरोग्य विभागाकडून योग्य त्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

केंद्राकडून केरळला ५०० कोटींची तर महाराष्ट्राकडून २० कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. येत्या काळात याठिकाणी आरोग्याच्या योग्य त्या सुविधा पोहचवून नागरिकांना आजारांची लागण होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. अतिवृष्टीमुळे केरळमध्ये आतापर्यंत २१ हजार कोटींचं नुकसान झालं आहे. हजारो लोक पुरात अडकल्याने त्यांना वाचवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून केरळमध्ये एनडीआरएफने आजवरचं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे. केरळमध्ये एनडीआरएफच्या १६९ टीम काम करत आहेत. २२ हेलिकॉप्टर, नेव्हीच्या ४० बोटी, कोस्ट गार्डच्या ३५ बोटींच्या सहाय्याने हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. या शिवाय स्थानीक तरुण, पोलीस आणि मच्छिमारांचीही मदत मिळत आहे.