बांगलादेश मुक्तीसाठी १९७१ साली झालेल्या युद्धाच्यावेळी गुन्हेगारी कारवाया केल्याचा ठपका ठेवत जमात ए इस्लाम या कट्टरपंथीय संघटनेच्या तीन वरिष्ठ नेत्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर उसळळेल्या हिंसाचारात आतापर्यंत १९ जण ठार झाले आहेत. या तणावाच्या पाश्र्वभूमीवर भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी रविवारी बांगला देशाच्या दौऱ्यावर गेले. मात्र बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्षा आणि विरोधी पक्षनेत्या खलिदा झिया यांनी त्यांच्याबरोबरची आधीच ठरलेली भेट रद्द केली आहे. सोमवारी त्या राष्ट्रपतींना भेटणार होत्या. मात्र सुरक्षेचे कारण पुढे करत त्यांनी ‘भारता’च्या राष्ट्रपतींना भेटणे टाळले आहे.
बांगलादेशातील युद्धगुन्हेगार आणि जमात-ए-इस्लामीचे उपाध्यक्ष दिलवर हुसैन सईदी यांच्यासह तीन वरिष्ठ नेत्यांना न्यायालयाने गुरुवारी मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. या निर्णयानंतर बांगलादेशमध्ये मोठय़ा प्रमाणात िहसाचार उफाळला आहे. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी बांगला देश दौऱ्यावर गेले आहेत. सोमवारी, ४ मार्च रोजी त्यांना बांगलादेशच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मात्र कट्टरपंथी जमात ए इस्लामने देशव्यापी बंदची हाक दिली आहे. तर विरोधी पक्षनेत्या खलिदा झिया यांनी सोमवारी ठरलेली राष्ट्रपतींसोबतची भेट रद्द केली आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी जमात ए इस्लामची समर्थक आहे.
दरम्यान, राष्टपतीपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर प्रणव मुखर्जी आपल्या पत्नीसह प्रथमच परदेश दौऱ्यावर आले असून भारत आणि बांगलादेश या दोन देशांमधील संबंध अधिक बळकट करण्यावर भर देणार आहेत. रविवारी हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद जिल्लूर रहमान यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे शाही स्वागत केले. विमानतळावरून राष्ट्रपती ढाका येथील सावर येथे असणाऱ्या राष्ट्रीय स्मारकाला भेट देण्यासाठी गेले. तेथे बांगलादेश मुक्तीसाठी  शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली.