स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु बनून पैसा कमावण्याचा नवा धंदा माडणाऱ्या आणि त्यासाठी हत्या करण्यासही मागे पुढे न पाहणाऱ्या कथीत गॉडमॅन बाबा रामपालचा सरकारी कर्मचारी ते आध्यात्मिक गुरु आणि त्यानंतर तुरुंगापर्यंतचा त्याचा प्रवास रंजक आहे. बाबा रामपाल याचे नाव रामपाल दास असे असून त्याचा जन्म हरयाणातील सोनेपतमधल्या गोहाना येथील धनाना गावात ८ सप्टेंबर १९५१ रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्याच्यावर धार्मिक संस्कार झाले होते. त्यानंतर मोठं झाल्यानंतर त्याने आयटीआयमधून इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला. त्यानंतर त्याने ज्युनिअर इंजिनिअर म्हणून १५ वर्षे हरयाणाच्या सिंचन विभागात काम केले. त्यानंतर मे १९९५ मध्ये त्याने ही नोकरी सोडली. सरकारी सेवेत कनिष्ठ अभियंता असलेल्या रामपालच्या जीवनात सर्वांत मोठा बदल झाला तो १९९४मध्ये जेव्हा तो एका कबीरपंथी संताच्या संपर्कात आला. या संताच्या भेटीनंतर रामपालने स्वतः आध्यात्माच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचे ठरवले आणि स्वतः नामकरण संत रामपालजी महाराज करुन घेतले. त्यानंतर लोकांना पापमुक्त करणारा महाराज म्हणून तो प्रसिद्ध पावला. त्यानंतर १९९५ मध्ये त्याने कबीरपंथी लोकांच्या विश्वात सतलोक आश्रम स्थापन केला. त्यानंतर अल्पावधीतच त्याने आपल्या आश्रमाचा पसारा प्रचंड वाढवला. हरयाणातील हिस्सार आणि रोहतकमध्ये त्याचे सम्राज्य निर्माण झाले. स्वयंघोषित गॉडमॅन आणि उच्च जीवनशैली आणि प्रचंड समर्थकांची संख्या असणारा बाबा रामपाल २००६मध्ये पहिल्यांदा वादामध्ये अडकला. त्याने त्यावेळी आर्य समाजाविरोधात भाष्य केले होते. त्यानंतर उसळलेल्या दंगलीत एकाचा मृत्यू झाला होता. ही दंगलच त्याला पहिल्यांदा कायदेशीररित्या अडचणीत टाकणारी ठरली. मंगळवारी (दि.१६) आणि बुधवारी (दि.१७) सत्र न्यायालयाने बाबा रामपालला दोन वेगवेगळ्या हत्या प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, तत्पूर्वी रामपालला या हत्या प्रकरणांमध्ये अटक झाली होती, त्यानंतर २००८मध्ये त्याला जामीनही मिळाला होता. त्यानंतर २०१४ मध्ये पोलिसांनी त्याला शरण येण्यास भाग पाडले. हत्या प्रकरणांमध्ये पंजाब आणि हरयाणातील हायकोर्टांनी त्याला कोठडी सुनावली होती. त्यानंतर हायकोर्टाचा आदेश धुडकावत कोर्टात हजर राहण्यास रामपालले नकार दिला होता. त्याने स्वतःला आपल्या आश्रमातच कोंडून घेतले होते. त्यानंतर पोलीसांना त्याला अटक करण्यासाठी आश्रमात येणे भाग पडले. त्यानंतर रामपाल समर्थकांनी पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब आणि अॅसिडची पाकिटे फेकून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारात पाच महिला आणि एक लहान मुलाचा मृत्यू झाला होता. या सर्व घडामोडीनंतर पोलिसांनी रामपालला अखेर ताब्यात घेतले त्यानंतर तो आजवर तुरुंगात शिक्षा भोगत आहे. बाबा रामपालच्या आश्रमातील सुविधा या एखाद्या लक्झरी हॉटेलमधील सुविधांसारख्या होत्या.