जागतिक भूक सुचकांक म्हणजेच 'ग्लोबल हंगर इंडेक्स'(जीएचआय)द्वारे नुकताच समोर आलेला अहवाल भारतासाठी धक्कादायक आहे. ज्या ठिकाणी मुलांच्या उंचीच्या तुलनेत त्यांचे वजन नसते, बालमृत्यू दर जास्त असतो व मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण जास्त आढळते, अशा ११७ देशांच्या यादीत भारत १०२ व्या क्रमांकावर आहे. तर, भारताव्यतिरिक्त अन्य आशिया देश हे क्रमवारीत ६६ ते ९४ दरम्यान आहेत. विशेष म्हणजे या यादीत पाकिस्तान देखील भारताच्या पुढे आहे. 'जीएचआय' - २०१९ मध्ये सांगण्यात आले आहे की, मुलांचे अशाप्रकारे नुकसान होण्याचा आकडा २०.८ टक्के आहे. अहवालात म्हटले आहे की, जगात मुलांच्या आरोग्याबाबत सर्वात खराब प्रदर्शन येमन, जिबूती आणि भारताचे राहिले आहे. ज्यांची टक्केवारी १७.९ ते २०.८ दरम्यान आहे. 'जीएचआय'कडून हे देखील सांगण्यात आले आहे की, भारतात ६ ते २३ महिन्यांच्या वयातील केवळ ९.६ टक्के मुलांनाच 'किमान स्वीकार्य आहार' दिला जातो. अहवालात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून २०१६ ते २०१८ दरम्यान करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर हे देखील सांगण्यात आले की, भारतात ३५ टक्के मुलं कमी उंची असलेले, तर १७ टक्के मुलं अशक्त आढळे आहेत. विशेष म्हणजे, या महिन्याच्या सुरूवातीसच आरोग्य मंत्रालयाकडून मोठ्याप्रमाणावर राष्ट्रीय पोषण सर्वेक्षणांतर्गत देशभरातील १९ वर्षांपर्यंतच्या १ लाख १२ हजार मुलांची पाहणी करण्यात आली होती. ज्याद्वारे असे समोर आले होते की, कुपोषण कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांमध्ये वाढ झाली आहे. आहार तज्ज्ञांच्या मते देखील २०१६-१८ मध्ये राष्ट्रीय पोषण सर्वेक्षण आणि जीएचआय यांच्यातील आकडेवारीची तुलना केली तर, भारताता कुपोषणाचे प्रमाण कमी आहे. जीएचआयच्या अहवालानुसार भारतात ६ ते २३ महिने वयोगटातील केवळ ९.६ टक्के मुलांनाच 'किमान योग्य आहार' उपलब्ध होतो. तसेच, भारत आशिया खंडातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. मात्र तरी देखील 'जीएचआय' मधील त्याचे स्थान दक्षिण आशियातील देशांच्याही खाली आहे. याचाच अर्थ असा होतो की, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ आणि श्रीलंकेच्याही भारत मागे आहे. या देशांचे क्रमांक अनुक्रमे ९४, ८८, ७३ व ६६ आहेत. २०१० मध्ये भारत या यादीत ९५ व्या स्थानी होता, जो २०१९ मध्ये १०२ वर आला आहे. वर्ष २००० मधील ११३ देशांच्या यादीत भारत ८३ व्या क्रमांकावर होता. या क्रमवारीत बेलारूस, यूक्रेन, तुर्की आणि कुवेत अग्रस्थानी आहेत. अशाप्रकारे ठरवला जातो देशाचा क्रमांक - देशातील भुकेच्या स्थितीवरून 'ग्लोबल हंगर इंडेक्स' मध्ये देशांना ० ते १०० असे गुण दिले जातात. त्यानुसार त्यांची क्रमवारी ठरवली जाते. यामध्ये ० गुण हे सर्वोत्तम समजले जातात, याचा अर्थ एकप्रकारे त्या देशात भुकेची स्थिती काळजी करण्यासारखी नाही असाच होतो. यानंतर १० पेक्षा कमी गुण असेल तर त्या देशांमधील भुकेची स्थिती फारशी गंभीर नाही असे समजल्या जाते. २० ते ३४.९ या दरम्यान गुण असतील तर भुकेचे गंभीर संकट दर्शवल्या जाते. ३५ ते ४९.९ दरम्यान गुण म्हणजे त्या देशातील भुकेची स्थिती आव्हानात्मक आहे. तर ५० व त्यापेक्षा अधिक गुण म्हणजे भुकेबाबत त्या देशातील परिस्थिती भयावह असल्याचे समजल्या जाते.