अपघातानंतर जखमींना रुग्णालयात पोहचवण्याबद्दल अद्यापही लोकांच्या मनात किती भीती आहे याचा प्रत्यय येईल अशी एक घटना कर्नाटकातील कोप्पल येथे घडली. भरधाव बसने चिरडल्यानंतर एक १८ वर्षीय मुलगा वेदनेने विव्हळत होता परंतु त्याच्या मदतीला कोणीही धावले नाही. त्या ऐवजी लोक त्याचे फोटो काढत होते आणि चित्रीकरण करीत होते असे पीटीआयने म्हटले आहे. काही वेळा नंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तोपर्यंत उशिरा झाला होता. तिथे दाखल झाल्यानंतर तो डॉक्टरांनी त्याला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. कोप्पल येथे एका टाइल्सच्या दुकानात काम करणारा अन्वर अली एकलासपूर हा १८ वर्षांचा मुलगा नेहमी प्रमाणे सायकलवरुन दुकानात जात होता. पाठीमागून आलेल्या भरधाव बसने त्याला चिरडले. त्या आघाताने अन्वर विव्हळू लागला आणि मदतीची याचना करू लागला परंतु त्याच्या मदतीला कुणीही धावले नाही. काही जणांनी पुढे येऊन त्याला पाणी पाजण्यात आले. गर्दीतील एका जणाने रुग्णवाहिकेला फोन केला आणि पोलिसांना फोन केला. २५ मिनिटांनी रुग्णवाहिका तेथे आली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला आणण्यास उशीर झाला असे डॉक्टरांनी अत्यंत खेदाने म्हटले. याआधी एका पोलीस अधिकाऱ्यालाही आपला जीव वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे गमवावा लागला.