करोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. जिवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता या काळात सर्व वस्तूंची दुकानं ही बंद राहणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केरळमधील तळीरामांची चांगलीच गोची झाली आहे. दारुची दुकानं बंद असल्यामुळे, गेल्या ५ दिवसांमध्ये ५ तळीरामांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात केरळमध्ये सरकारला, या समस्येलाही तोंड द्यावं लागणार आहे.

शनिवारी मल्लपूरम जिल्ह्यात दोन व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे या संख्येत अधिक भर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत केरळमधील व्यसनमुक्ती केंद्र आणि सरकारी रुग्णालयात मानसोपचारतज्ज्ञांकडे तपासायला येणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ झाल्याचं कळतंय. “सध्या सर्व महत्वाच्या सरकारी रुग्णालयांमध्ये करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामुळे दारुशी निगडीत असणाऱ्या सर्व रुग्णांसाठी आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मानसोपचार तज्ज्ञांची मतं घेत आहोत. गरजेनुसार या रुग्णांना तालुका किंवा जिल्हा पातळीवरील रुग्णालयात आणता येईल, यासाठी प्रत्येक रुग्णालयात २० बेड स्वतंत्र ठेवण्यात आले आहेत.” केरळच्या आरोग्यमंत्री के.के.शैलजा यांनी माहिती दिली.

“दारु सोडवण्यासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी आम्ही व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये टेलि काऊन्सिलींगची सोय केली आहे. शनिवारी किमान १०० लोकं गंभीर अवस्थेत आमच्या केंद्रावर आली होती. या सर्वांना त्वरित वैद्यकीय मदतीची गरज होती. गरज पडल्यास यासाठी आम्ही खासगी डॉक्टरांचीही मदत घेत आहोत. काही जणांना दररोज दारु पिण्याची सवय असते, ती दारु मिळाली नाही की त्यांच्यात नैराश्य यायला सुरुवात होते. यामधून मनात आत्महत्येचे विचार येतात. अंग थरथर कापणे, चक्कर येणे, घाम फुटणे अशी लक्षण सध्या केरळमधील व्यसनमुक्ती केंद्रात येणाऱ्या रुग्णांमध्ये आढळत असल्याचं, विशेष कार्यकारी अधिकारी. डी. राजीव यांनी सांगितलं.