कर्करोग उपचारांसाठी जगातून मागणी; अंदमान-निकोबार बेटे, तामिळनाडू व केरळ राज्यात लागवड कर्करोगावर अत्यंत गुणकारी असलेल्या लक्ष्मण फळाला जगभरातून मोठी मागणी आहे. अंदमान-निकोबार बेटे, तामिळनाडू व केरळ राज्यात त्याची लागवड होते. वर्षांनुवर्षे त्याचे जतन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता स्वामित्व हक्क देण्याचा विचार प्रथमच कृषी शास्त्रज्ञांनी मांडला असून तसे धोरण घेतले जाणार आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या अटीनुसार आता पिकांचे बौद्धिक हक्क व पेटंट दिले जातात. ट्रिप्स कायद्याखाली शेतीविषयक नियमानुसार तो हक्क मिळतो. त्यासाठी २००१ साली पीकवाण संरक्षण, शेतकरी हक्क, प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. त्यांच्यामार्फत कंपन्या, संस्था व शेतकऱ्यांना स्वामित्व हक्क दिले जातात. पिकातील वेगळेपण, एकसारखेपणा, स्थिरीकरण आदी गुणधर्माचा अभ्यास करण्यासाठी पीकवाण तपासणी केंद्रे (डस) देशभर विविध कृषी विद्यापीठे व कृषी संशोधन संस्थामध्ये केले जाते. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात या केंद्रातील सुमारे सव्वाशे शास्त्रज्ञांची वार्षिक आढावा बैठक पार पडली. बैठकीला प्राधिकरणाचे अध्यक्ष व धारवाड कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आर. आर. हंचिनाळ, सचिव डॉ. आर. सी. अग्रवाल, कृषी अनुसंधान परिषदेचे संचालक डॉ. के. कृष्णकुमार, कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, संचालक डॉ. किरण कोकाटे आदी उपस्थित होते. अंदमान येथील सेंट्रल आयलँड अॅग्रिकल्चर रीसर्च इन्स्टिटय़ूटचे माजी संचालक व सिक्कीम येथील एन.आर.सी.चे संचालक डॉ. डी. आर. सिंग यांनी लक्ष्मण फळाला शेतकऱ्यांना स्वामित्व हक्क देण्याचा विचार व्हावा, त्यासाठी एक केंद्र देशात सुरू करावे अशी सूचना केली. लक्ष्मण फळ हे कर्करोगावर अत्यंत गुणकारी असून, तेथील आदिवासी शेतकरी त्याचा शेकडो वर्षांपासून औषध म्हणून वापर करीत आहेत. या फळाला जगभर मागणी आहे. मात्र वेळीच त्याकडे लक्ष दिले नाही तर अन्य लोक त्याचे स्वामित्व हक्क घेतील. ते टाळण्यासाठी त्वरित निर्णय घ्यावा अशी सूचना त्यांनी केली. अनोना मुरीकट्टा हे या फळाचे नाव असून, त्याला अंदमानमध्ये मुंडलाफल असे म्हणतात. त्याचे शास्त्रीय नाव सोरसोप असे असून, िहदीत लक्ष्मण फळ किंवा शुलराम फळ असेही म्हणतात. अतिआर्द्रता व उष्णतेच्या ठिकाणीच या फळाचे झाड येते. मेक्सिको, क्युबा, मध्य अमेरिका, ब्राझील व भारतात अंदमान, केरळ, तामिळनाडूत ते मिळते. जंगली फळ म्हणूनच त्याचा उल्लेख होतो. आता केरळ, कर्नाटक व तामिळनाडूने या फळाकडे विशेष लक्ष दिले आहे. सीताफळाच्या आकाराचे व त्यासारखेच दिसणाऱ्या मात्र टणक असलेल्या या फळावर काटे असतात. त्याची चव अननस व स्ट्रॉबेरीच्या एकत्रित स्वादासारखी असते. या फळात कबरेदके, डायट्रीफॅट, प्रोटीन, तंतुमय पदार्थ, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे व लोह जास्त असते. तसेच लायकोसीनचे प्रमाण अधिक आहे. या फळाच्या सेवनामुळे कर्करोग बरा होतो, असे जगातील काही कर्करोग संशोधन संस्थांनी केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. या फळाची पाने, बी व सालीचाही उपयोग होतो. अल्सर, हाडांचे आजार, यकृत, स्वादुिपड यांच्या आजारावर ते गुणकारी समजले जाते. सध्या जगभर या फळावर संशोधन सुरू आहे. कर्करुग्णांना केमोथेरपी उपचार घेतल्यानंतर उष्णतेचा त्रास होतो. ही उष्णता कमी करण्यात लक्ष्मण फळ उपयुक्त मानले जाते. ही फळे शेतकऱ्यांकडून खरेदी करून ती काही लोक व संस्था तसेच आयुर्वेदिक क्षेत्रातील तज्ज्ञ त्यांची ऑनलाइन पद्धतीने विक्री करतात. अशा या बहुगुणी फळाच्या विविध जातींची झाडे अंदमानमधील शेतकऱ्यांकडे आहेत. त्या शेतकऱ्यांनी पिढय़ान्पिढय़ा ते जतन केले आहे. आता या फळाचा स्वामित्व हक्क कायद्यात समावेश करावा अशी मागणी पुढे आली आहे.