सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचं वयाच्या ९५ व्या वर्षी राहत्या घरी निधन झालं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्थिर होती. ‘पद्मभूषण’, ‘दादासाहेब फाळके’ यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केल्या गेलेल्या मृणाल यांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मोलाचं योगदान दिलं.

मृणाल यांनी १९५५ मध्ये ‘रातभोर’ या आपल्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली. मात्र त्याला म्हणावा तसा प्रतिसाद आणि प्रसिद्धी मिळाली नाही. मात्र यातून खचून न जाता त्यांनी १९६० मध्ये ‘बाइशे श्रावण’या चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट चांगलाच गाजला. मृणाल यांचा जन्म १४ मे १९२३ मध्ये फरीदपुरमध्ये झाला. हे शहर बांगलादेशमध्ये आहे. मृणाल यांनी बांगला भाषेतील चित्रपटांची सर्वाधिक निर्मिती केली. मिथुन चक्रवर्ती यांचा पहिला चित्रपट ‘मृगया’चं दिग्दर्शन ही त्यांनी केलं होतं. मृणाल सेन यांना २० राष्ट्रीय आणि १२ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.

आंतरराष्ट्रीय जगतात त्यांच्या चित्रपटांची दखल घेण्यात आली. ऐशींच्या दशकात सुरू झालेल्या समांतर चित्रपट चळवळीत मृणाल यांचं योगदान मोलाचं होतं. २००२ साली  त्यांनी ‘आमार भुवन’ या शेवटच्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.