केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी काँग्रेससह दहा विरोधी पक्षांनी मंगळवारी दिल्लीत संसद ते राष्ट्रपती भवन पदयात्रा काढली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया यांनी या पदयात्रेचे नेतृत्त्व केले. यावेळी शरद यादव, सीताराम येचुरू, सुप्रिया सुळे, दिनेश त्रिवेदी यांसह विरोधी पक्षातील अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते. 
विरोधकांनी राष्ट्रपती भवनापर्यंत पदयात्रा काढून भूसंपादन विधेयकाविरोधी घोषणाबाजी करत या विधेयकाबद्दलचे निवेदन राष्ट्रपती प्रणव मुखर्जींसमोर सादर करण्यात आले.
भू-संपादन विधेयक लोकसभेमध्ये सरकारने जनमताच्या जोरावर संमत केले मात्र, राज्यसभेत हे विधेयक मंजूर करताना सरकारला मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. काँग्रेस पक्षाने यावेळी आक्रमक भूमिका घेऊन कोणतीही परवानगी न घेता संसद ते राष्ट्रपती भवन पदयात्रा काढण्याचे ठरविले. दरम्यान, अधिवेशनाचा कालावधी असल्याने संसद आणि राष्ट्रपती भवन परिसरात कलम १४४ नुसार जमावबंदी लागू असल्याने सुरूवातीला या पदयात्रेला परवानगी देण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती. परंतु, अखेरीस सरकारने पदयात्रेला परवानगी दिली.